MARATHI POET | WRITER | ORATOR

गजानन महाराज आणि त्यांचे परमभक्त

श्री गजानन महाराज आणि त्यांचे परमभक्त

|| गण गण गणात बोते ||

श्री संत गजानन महाराज हे महाराष्ट्रातील संतपरंपरेतील एक तेजस्वी संत आहेत. शेगाव ही त्यांची कर्मभूमी असली, तरी त्यांच्या असंख्य लीलांनी आणि परमभक्तांच्या माध्यमातून अनेक स्थळे आजही पवित्र मानली जातात. विदर्भाची पंढरी म्हणजे आपल्या श्री गजानन महाराजांचं शेगाव. मुंबई – हावडा या रेल्वेमार्गावर एक छोटंसं शेगाव हे गजानन महाराजांमुळेच प्रसिद्धीस पावलं. आज गजानन महाराजांची भक्त मंडळी फक्त विदर्भातचं नाही तर भारतभर, विश्वभर वेगाने वाढत आहे. कारणही तसंच आहे. “शेगाव सारखी स्वच्छता, “माऊली” म्हणून हाक मारणारे सगळे भक्तगण आणि मंदिराचं चौकटी पलीकडचं व्यवस्थापन. भारतभर तुम्ही कितीही-कुठेही फिरा पण शेगावसारखी शांतता तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. पक्ष्यांचा किलबिलाट, टाळ मृदूंगाचा नाद तुमच्या कानाला नवे सूर आणि जीवनाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात.”

आज आपण महाराजांचे चार प्रमभक्तांविषयी बोलू. पहिले परमभक्त म्हणजे श्री भास्कर पाटील महाराज. दुसरे परमभक्त म्हणजे पुंडलिक महाराज भोकरे, तिसरे परमभक्त म्हणजे झ्यामसिंग, चौथी परमभक्त बायजाबाई.

अकोली जहागीर येथे १८८८ रोजी दुष्काळ पडला होता व महाराज चालत चालत भास्कर पाटील यांच्या शेतात आले.भास्कर पाटील यांनी आपल्या शेतात फार दुरून एक घागर पाण्याने भरून आणली होती, महाराजांनी त्यांना प्यायला पाणी मागितले तेव्हा भास्कर पाटलांनी महाराजांना पाणी देण्यास नकार दिला आणि ते महाराजांना वाईटसाईट बोलले. अकोली ग्रामस्थांची समस्या महाराजांना कळली व साक्षात पांडुरंगाला प्रार्थना करून महाराजांनी भास्कर पाटील यांच्या शेतातील १२ वर्षापासून कोरड्या असलेल्या विहिरीला जलमय केले व ही विहीर आजही जलमय आहे. तेव्हापासून भास्कर यांनी आपले घरदार सोडून महाराजांच्या बरोबर त्यांची सेवा करायला ते शेगावला आले.भास्कर पाटील हे सतत महाराजांबरोबर सावलीसारखे असायचे.सन १९०७ साली महाराजांच्या समक्ष भास्कर पाटील यांनी आपला श्वास सोडला व महाराजांनी त्यांना स्वहस्ते अडगाव येथे समाधी दिली.

मुंडगाव येथे १८९५ साली पुंडलिक भोकरे यांचा जन्म झाला.महाराजांच्या भक्तमंडळी मध्ये पुंडलिक सर्वात लहान होते.पुंडलिक महाराजांना प्रेमाने ‘बुढा’ म्हणायचे. महाराजांनी पुंडलिक यांना पादुकांचा प्रसाद दिला होता.महाराजांनी मंदिर परिसरात १९०८ साली पुंडलिक यांना प्लेगच्या रोगतून बरे केले.महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात पुंडलिकाचे फार मोठे योगदान होते. महाराजांनी समाधिस्त झाल्यावरही त्यांना दर्शन दिले होते. मुंबई येथे १९६८ साली पुंडलिक भोकरे यांचा मृत्यू झाला.

झ्यामसिंग शेखावत हे राजपूत गृहस्थ मुंडगांव येथे राहत होते. ते महाराजांचे फार मोठे भक्त होते. महाराजांनी पुंडलिक भोकरे यांना दिलेल्या पादुका ह्या झ्यामसींग यांच्याच हातून पाठवल्या होत्या. सन १९०८ साली महाराज सर्वप्रथम मुंडगाव येथे आले असताना ते झ्यामसींग यांच्या घरी राहिले.एकदा महाराजांची आज्ञा न ऐकता झ्यामसिंग यांनी घातलेल्या भंडाऱ्यात अचानक पाऊस आला व सर्व तयारी वाया गेली, तेव्हा महाराजांनी त्यांना दुसऱ्या दिवशी भंडारा ठेवायला सांगितले,असे म्हणताच महाराजांनी अकाशाकडे पाहिले व आभाळ फाकुन गेले. महाराजांच्या कृपेने दुसऱ्या दिवशी भंडारा निर्विघनपणे पार पडला.महाराजांची ज्या रथातून मिरवणूक काढण्यात आली होती त्या रथाचा अवशेष आजही मुंडगाव येथील मंदिरात आहे व झ्यामसिंग यांनी आपली सर्व इस्टेट महाराजांना अर्पण केले होती.

बायजाबाई या शेगावच्या संत गजानन महाराजांच्या परम भक्त होत्या. त्यांचा जन्म मुंडगाव येथील गासे माळी कुटुंबात झाला. पूर्वीच्या प्रथेप्रमाणे वयाच्या केवळ तिसऱ्या वर्षी बायजाबाईंचा विवाह अकोट येथील शनिवार पेठेतील गबलाजी खलोकर यांच्याशी झाला. पण नशिबात संसारसुख नव्हते. बायजाबाईंना दुःखी जीवन भोगावे लागले. आई-वडिलांनी अनेक प्रयत्न केले, पण शेवटी तिला सासरीच ठेवण्याचे ठरवले. सासरी ज्येष्ठ दिराने तिच्यावर अनुचित आकर्षण दाखवले, तिचे चित्त विचलित करण्याचे प्रयत्न केले. पण बायजाबाईंनी ठामपणे त्याला धुडकावले. एकदा जेव्हा दिराने निर्लज्जपणे तिच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात त्याचा थोरला मुलगा माडीवरून खाली पडला आणि डोके फुटले. बायजाबाईंनी तात्काळ त्याची सेवा केली आणि दिराला सांगितले, “परस्त्रीची लालसा करणे योग्य नाही. हे तुमच्या कृत्याचे फळ आहे.” या घटनेने दिराला प्रचंड पश्चाताप झाला आणि त्याने तिचा नाद सोडला. अशाप्रकारे परमेश्वराने तिचे सत्वरक्षण केले. आई-वडिलांनी बायजाबाईंना शेगाव येथे श्री गजानन महाराजांकडे नेले. महाराजांनी स्पष्ट सांगितले,
“हिच्या नशिबात मुले-बाळे नाहीत. ही संसारासाठी जन्मली नाही. जगातील सर्व पुरुष हिचे तात (वडील) आहेत. तिला संसारात ढकलू नका.” महाराजांच्या आज्ञेप्रमाणे बायजाबाईंनी संसाराचा त्याग केला. त्या पुंडलिक भोकरे (मुंडगावचे परमभक्त, कुणबी) यांच्यासोबत वद्य एकादशीला शेगावला पायी वारी करू लागल्या. दोघांचे अंतःकरण शुद्ध होते, विषयवासनेला स्थान नव्हते. तरी गावकऱ्यांनी निंदा-नालस्ती सुरू केली – जातीभेद, प्रेमसंबंध अशा अफवा पसरवल्या. शेवटी आई-वडिलांनी दोघांना घेऊन महाराजांकडे न्यायासाठी गेले. महाराजांनी भुलाबाईंना उद्गारले, “भूले, आपल्या पोरीला दोष देऊ नकोस. पुंडलिक व बायजा हे पूर्वजन्मीचे बहीण-भाऊ आहेत. ही संसार करणारी नाही. ही जन्मभर ब्रह्मचारी राहील आणि भक्तिमार्गात मग्न राहील. संत जनाबाईने संत नामदेवांना गुरु केले तशी ही बायजा मला शरण आली आहे. ही माझी जनाबाई आहे! माझ्या जनाबाईला कोणी छळू नये.” महाराजांनी स्वतः “माझी जनाबाई” म्हणून बायजाबाईंचे श्रेष्ठत्व जगासमोर आणले. यामुळे त्यांचे नाव संत बायजाबाई असे झाले.

मी वरील परिच्छेदात प्रत्येक भक्त आणि त्यांची ठिकाणं ठळक अक्षरात अधोरेखित केली आहे. आता आपण ती सगळ्या ठिकाणांविषयी जाणून घेऊ. मी प्रत्येक ठिकाण आणि त्यांचे क्रम पुढे देत आहे . आम्ही हि सगळी ठिकाण एका दिवसात बघितली त्याला जवळपास पाच ते सहा तास लागतात. रस्त्यांचे बांधकाम चालू असल्याने फार वेळ लागतो. मी तुम्हाला शेगाव वरून सुरवात करून परत शेगावला यायचा क्रम खाली देत आहे. शेगाववरून सगळ्यात आधी अकोली जहागीर गाठायचं. सगळ्यात दूर ते आहे. दूरच ठिकाण आम्ही आधी केलं. शेगाव ते अकोली जहागीर ६९ किमी आहे.

श्री गजानन मंदिर, अकोली जहांगीर

महाराजांनी भास्कर पाटील यांच्या शेतातील १२ वर्षापासून कोरड्या असलेल्या विहिरीला जलमय केले त्या विहिरीला “सजल विहीर” म्हणतात व ही विहीर आजही जलमय आहे. याच ठिकाणी श्री गजानन मंदिर, अकोली जहांगीर हे मंदिर उभारलं आहे.

या विहिरीला तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला गजानन महाराज मंदिर अकोला जहागीर येथे यावे लागेल. मी खालील मंदिराचं लोकेशन टाकत आहे.

Google Location: गजानन मंदिर, अकोली जहांगीर

https://maps.app.goo.gl/oBDcoFzPN34vLrHG7?g_st=ac

Spread the love

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *